You are currently viewing Raksha Bandhan 2024 Marathi : यंदा किती तारखेला साजरे होणार रक्षाबंधन? महत्त्व आणि इतिहास
Raksha Bandhan 2024

Raksha Bandhan 2024 Marathi : यंदा किती तारखेला साजरे होणार रक्षाबंधन? महत्त्व आणि इतिहास

मुंबई : (Raksha Bandhan 2024 Marathi) भारतात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्योतिषांच्या मते, यंदा राखीच्या दिवशी तब्बल 90 वर्षांनंतर 4 शुभ संयोग घडत आहेत. या योगांमध्ये रक्षाबंधन साजरे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.

तर दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्राची सावली रक्षा बंधनावर असणार आहे. त्यामुळे भद्राकाळ उलटल्यानंतरच रक्षा बंधनाचा सण साजरा करणे योग्य ठरेल .  भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला जपणारा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा श्रावण महिन्याची पौर्णिमा 19 ऑगस्टला आहे. रक्षा बंधनासोबतच यंदा श्रावण सोमवारही असल्याने या सणाचे महत्त्व आणखी वाढले आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त कोय आहे तसेच भद्राचा कालावधी किती असेल ते जाणून घेऊया.

रक्षाबंधन मुहूर्त (Raksha Bandhan Muhurat 2024)

रक्षाबंधनाची चर्चा होताच प्रत्येकाच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे भाद्र कालाळाची. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते आणि यावेळी श्रावण पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 2:05 वाजता सुरू होईल आणि 11:56 वाजता संपेल. त्यामुळे उदया तिथी लक्षात घेऊन 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

रक्षाबंधनाला इतक्या वेळ राहाणार भद्राची सावली (Raksha Bandhan Bhadra kal 2024)

या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाल पहाटे 5.53 ते दुपारी 1.31 पर्यंत असेल. तथापि, ज्योतिषांच्या मते या वर्षी भद्रा पाताळात राहणार आहे, त्यामुळे तो फारसा अशुभ मानला जाणार नाही. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जेव्हा भद्रा पाताळात किंवा स्वर्गात राहते तेव्हा त्यामुळे पृथ्वीवरील लोकांना फारशी हानी होत नाही. तथापि, बंधू आणि भगिनींना सल्ला दिला जातो की भाद्र कालावधी संपल्यानंतरच रक्षाबंधन सण साजरा करणे चांगले होईल.

रक्षाबंधनाला राखी बांधण्याची सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे दुपारी 1:32 ते रात्री 9.08. म्हणजेच राखी बांधण्यासाठी बहिणींना एकूण 7 तास 38 मिनिटे मिळतील. या वर्षी रक्षाबंधनाला सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग आणि रवि योग यांचा शुभ संयोग आहे. या शुभ दिवशी राखी बांधल्याने भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम वाढते आणि दोघांच्याही घरात सुख-समृद्धी येते.

देवी लक्ष्मीने राजा बळीला बांधली होती राखी

स्कंद पुराण, पद्म पुराण आणि श्रीमद भागवत पुराणातील कथांनुसार, राक्षस राजा बळी हे भगवान विष्णूचे परम भक्त होता. एकदा तो देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करत होता. आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार घेतला आणि ब्राह्मणाच्या वेषात भिक्षा मागण्यासाठी राजा बळीच्या दारात पोहोचले. भगवान वामनांनी दान म्हणून तीन पाऊलं जमीन मागितली. राजाने ब्राह्मणाची मागणी मान्य केली. ब्राह्मणाने पहिल्या पाऊलाने संपूर्ण जमीन आणि दुसऱ्या पायाने संपूर्ण आकाश व्यापले. मग देवाने विचारले तिसरे पाऊल कुठे टाकायचे. तेव्हा राजा बळीने आपले डोके पुढे केले आणि सांगितले की तूम्ही माझ्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवा.

राजाची ही भक्ती पाहून भगवान वामनांनी त्याला पाताळाचा राजा बनवले. राजा बळीने सुद्धा वरदान मागितले की तूम्ही त्याच्या बरोबर पाताळात रहा. दुसरीकडे भगवान विष्णू परत न आल्याने लक्ष्मी देवी चिंतेत पडली. एका गरीब स्त्रीचा वेश धारण करून तिने राजा बळीकडे जाऊन त्याला राखी बांधली. राजाने राखीच्या बदल्यात काहीही मागायला सांगितले. म्हणून देवी लक्ष्मी तिच्या वास्तविक रूपात आली आणि भगवान विष्णूच्या परतीची मागणी केली. राखीचा मान राखून राजाने भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसह परत पाठवले.

 महाभारत काळात सापडतात या कथा

असे मानले जाते की महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने राजा शिशुपालाला त्याच्या पापाचा घडा भरल्यानंतर सुदर्शन चक्राने मारले होते. त्यामुळे त्यांच्या बोटातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिथे उपस्थित असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले. आपले वचन पाळत भगवान श्री कृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण करताना तिचे रक्षण केले. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात.

रक्षाबंधनाशी संबंधित आणखी एक कथा महाभारत काळात प्रचलित आहे. ज्यानुसार, महाभारताच्या युद्धाच्या वेळी, जेव्हा युधिष्ठिराने भगवान कृष्णाला विचारले की आपण सर्व संकटांवर मात कशी करू शकता, तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिरला आपल्या सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांधण्यास सांगितले. युधिष्ठिराने तेच केले आणि आपल्या संपूर्ण सैन्यातील प्रत्येकाला संरक्षणाचा धागा बांधला.

ही कथा मुघल काळाशी संबंधित आहे

एक काळ असा होता की देशातील राजपूत मुस्लिम आक्रमणाविरुद्ध लढत होते. पती राणा संगाच्या मृत्यूनंतर मेवाडची कमान राणी कर्णावतीने घेतली. चित्तोडची राणी कर्णावती हिने सम्राट हुमायूनला पत्रासह राखी पाठवून तिच्या राज्याचे आणि स्वतःचे गुजरातच्या सुलतान बहादूर शाहच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याची विनंती केली होती. हुमायूने राखी स्वीकारली आणि राणी कर्णावतीच्या रक्षणासाठी चित्तोडला रवाना झाला. परंतु त्यांना पोहोचण्यास उशीर झाला आणि राणीने तिच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सती झाली. पण वचन पाळत हुमायूनच्या सैन्याने शहाला चित्तोडमधून हुसकावून लावले आणि राणीचा मुलगा विक्रमजीत सिंग याच्या हाती चित्तोडची सत्ता दिली.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply